Maharashtra

शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेंद्र भारूड

शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेंद्र भारूड

प्रतिनिधी फहिम शेख

नंदुरबार दि. 15- जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ देण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील, जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, यावर्षी जिल्ह्यात पीककर्जाचे उद्दीष्ट पूर्ण होईल यासाठी एकत्रित प्रयत्न करावे. आतापर्यंत कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी तहसीलदारांनी तयार करावी व ती अग्रणी बँक व्यवस्थापकांकडे द्यावी. कृषी विभागाच्या आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्जाची व ते घेण्यासाठी आवश्यक प्रक्रीयेची माहिती द्यावी. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्जाच्या माध्यमातून मोठा आधार मिळू शकेल.

जिल्ह्यात भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नगर पालिका आणि कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. नंदुरबार आणि शहादा शहरात वॉर्डनिहाय शेतकरी गटांना भाजीपाला विक्रीसाठी प्रोत्साहीत करावे व त्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने तयार करावे. दोन-तीन गावातील शेतकऱ्यांचे समूह तयार करावे व त्यांच्याकडील उत्पादनाची माहिती संकलीत करावी. लोकप्रतिनिधी व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वॉर्डनिहाय मागणी नोंदविण्याची पद्धत निश्चित करावी. या सुविधेची प्रसिद्धी करण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवू नयेत. शेतमाल खरेदी-विक्री करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. समिती परिसरात शिवभोजन केंद्र सुरू करून त्याचा लाभ गरजूंना द्यावा. शेती संबंधीत सर्व दुकाने, तसेच शेतीपूरक सेवासंबंधीत दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. अशा दुकानांची माहिती तात्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले.
ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ट्रॅक्टर दुरुस्ती, ग्रामीण भागात डिझेल विक्री आणि अन्य कृषीसाठी आवश्यक सेवा सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस तहसीलदार, नगरपालिकेचे अधिकारी, कृषी अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
—–

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button