आमसभा आयोजित करा :
निंभोरा येथील महाराजस्व अभियानात मागणी
रावेर प्रतिनिधी
निंभोरा,ता.रावेर- येथे आयोजित महाराजस्व अभियानाच्या समारोपप्रसंगी माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना रावेर तालुक्याची गेल्या ४ वर्षात न झालेली आमसभा आमदारांनी बोलवावी अशी मागणी केली.आ.हरीभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून रावेर तालुक्यात गावोगावी विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाचे व नागरिकांना गरजेचे दाखले वाटप करण्यासाठी आपले सरकार पोर्टलचा कॅम्प लावून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.
निंभोरा येथे सुद्धा या अभियानाचे आयोजन आज १४ जून रोजी करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.हरीभाऊ जावळे हे होते.यावेळी जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,सरपंच डिंगबर चौधरी,माजी उपसरपंच व जनसंग्राम संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, उपसरपंच सुभाष पाटील, प्रल्हादभाऊ बोंडे, रोहिदास ढाके,ज्ञानदेव नेमाडे,सुधाकर भंगाळे,प्रभाकर सोनवणे,हरेश्वर चौधरी,नायब तहसिलदार कविता देशमुख, मंडळाधिकारी सचिन पाटील, तलाठी एस.आर. तडवी,अव्वल
कारकून शेखर तडवी आदी उपस्थित होते.
महाराजस्व अभियान गावागावांत का गरजेचे आहे ? यामागची भूमिका नंदकिशोर महाजन यांनी मांडली.
दरम्यान,सरपंच डिंगबर चौधरी यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.त्यानंतर विवेक ठाकरे यांनी आपल्या मनोगतात तालुक्याची ४ वर्षात आमसभाच झाली नसल्याने नाराजी व्यक्त केली.आमसभेत पाणी बचत,संपूर्ण स्वच्छता, आदर्श काम करणाऱ्या ग्रामपंचायती, शासनाच्या नवीन योजना आदी संकल्पना सर्वांसमोर ठेवता येतील. शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी प्रचंड अडचणी येतात.बँक अधिकारी सुशिक्षितांना मंजूर झालेल्या प्रकरणांना वित्तपुरवठा करीत नाहीत अशा अनेक समस्या नागरिकांना येत आहेत म्हणून आमसभा होणे गरजेचे असल्याचे श्री.ठाकरे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक श्रावगे यांनी केले.आभार मनोज सोनार यांनी मानले. यशस्वीतेसाठी दिपक इंगळे, सचिन श्रावगे,राजू कोळी व प्रभाकर कोळी यांनी परिश्रम घेतले.








