येवला तालुक्यातील डोंगरगावची कन्या झाली तहसीलदार
येवला प्रतिनिधी विजय खैरनार
येवला : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल लागला असून, त्यात येवला तालुक्यातील डोंगरगाव हे मूळगाव असलेल्या व सध्या नाशिक येथे स्थायिक असलेल्या ऋ तुजा प्रकाश पाटील हिने तहसीलदारपदाला गवसणी घातली आहे.
ऋ तुजाने कुठल्याही प्रकारचे क्लास न लावता घरीच अभ्यास केला. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास तिने सातत्याने चालू ठेवत नुकत्याच झालेल्या परीक्षांमधून तिने मोठे यश मिळविले.
ऋ तुजा एचपीटी कॉलेजमध्ये २०१७ साली बी.ए. झाल्यानंतर २०१८ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये मुलाखतीपर्यंत मजल मारली. आणि २०१९ साली दुसऱ्याच प्रयत्नात तहसीलदारपदी निवडला गेली. ऋ तुजाला मुलाखतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त-७० गुण मिळाले. चार वर्षांपूर्वी ऋ तुजाचे वडील प्रकाश पंढरीनाथ पाटील (मोटार वाहन निरीक्षक) यांचा भुदरगड किल्ला, कोल्हापूर येथे सहकुटुंब फिरायला गेले असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता.
“वडील सरकारी अधिकारी होते त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली. ते म्हणत असत, लोकोपयोगी कामे करता येतील व त्यातून त्यांचा आदर मिळेल अशी नोकरी असावी आणि त्यासाठी सरकारी अधिकारी होणे हाच उत्तम मार्ग आहे. आज त्यांची व आईची इच्छा पूर्ण करता आली याचा अतिशय आनंद होत आहे. पुढे चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात विकासाची कामे करण्याची इच्छा आहे”.
– ऋतुजा पाटील