Maharashtra

स्पीडगन : सापळा लावून वाहन धारकांना लुटीचा नवा फंडा !काय आहे जाणून घेऊ..!

स्पीडगन : सापळा लावून वाहन धारकांना लुटीचा नवा फंडा !काय आहे जाणून घेऊ..!

धुळे ,औरंगाबाद , बीड , सोलापूर खाजगी वाहनाने प्रवास करताना 500 ते 600 रुपये टोल भरावा लागतो. पण तुम्हाला कल्पनाही नसेल,ह्या व्यतिरिक्त रस्त्याच्या कडेला काना कोपर्‍यात , घाट उतारावर कायद्याची झुल पांघरून कुणी रस्ते लुटारू दबा धरून बसला आहे.प्रवासी आपल्या प्रवासाच्या आनंदात मग्न असतो आणि भामट्या प्रवृतीने उतारावर लपून, दबा धरून बसतात आणि सहज रित्या प्रवाश्यांना लुटतात. संपूर्ण प्रवासात असे उतारावर चार दबा धरून बसलेले भामट्या प्रवृत्तीवाले भेटले तर ते खिसा कापू शकतात . राज्यभर अनेक महामार्गांवर हा प्रकार आता सुरु झाला आहे.

विषय आहे तो महामार्गावरील आरटीओंच्या ऑटोमेटिक स्पीडगन वाहनांचा. गेल्या काही दिवसांपासून वाहन चालक या स्पीडगन मुळे चांगल्रेच परेशान झाले आहेत. अलिकडे शासनाने वाहतूक नियमात मोठे बदल केले आहेत. दंडांच्या रकमा प्रचंड वाढविल्या आहेत.त्याचे चटके पुढे सर्वांनाच असह्य होणार आहेत. त्याची झलक आता कुठे सुरु झाली आहे. या महामार्गांवर आता जागोजागी आरटीओ च्या गाड्या उभ्या राहतात. त्यात मागे एक ऑटोमॅटिक स्पीडगन कॅमेर्‍या सह लावलेली असते. येणाऱ्या वाहनावर ही गन रोखली, की तिचा वेग आणि गाडी नंबर त्यात रेकोर्ड होतो. गाडी ओव्हर स्पीड असली, की त्याची माहिती ऑनलाईन त्यांच्या सर्व्हरला जाते. त्याबाबतचा दणकून दोन हजार रुपये दंड त्या वाहनाच्या क्रमांकावर चार्ज होतो. इकडे गाडीमालक किंवा ड्रायव्हरला खबरही नसते. याच प्रकारे इतर वाहन नियम मोडणाचांचे मोबाईल फोटोही सर्व्हरला जातात. त्यावरही जबर दंड त्या वाहन नंबरच्या खात्यावर लावला जातो. हा दंड ऑन लाईन भरावा लागतो किंवा रांग लावून भरावा लागतो. जेव्हा केव्हा गाडीची विक्री किंवा अन्य काम आरटीओ ऑफिसला निघते तेव्हा ही भल्या मोठ्या दंडाची यादी गाडी मालकाच्या हातात पड़ते. तो दंड भरल्या शिवाय काम होतच नाही. दंड भारला नाही तर कोर्टच्या चकरा व अन्य कारवाई वाटच पाहात असते.

बहुतेक वाहन धारकांची ओरड आहे की हे ऑटो स्पीडगन वाले वाहन ठरवून कोपर्‍यात, अडचणीच्या जागी, उतारावर, घाटउतारावर लावलेले असते . उतारावर वेग आपोआप वाढतो शिवाय वाहन चालकास ते दिसू नये व बेसावध शिकार जाळ्यात अडकवावी, असा उद्देश त्यामागे दिसून येतो. शहरात देखील चौकातील किंवा नो एन्ट्रीचा वाहतूक पोलिस कुठेतरी टपरीआड लपून बसतो. नवख्या वाहन धारकास नो एन्ट्रीत आधी घुसू देतो व मग लागलीच रस्त्यावर अवतीर्ण होवून शिटी मारतो.नंतरचे आपण सर्वांना ठाउकच असते. मध्यंतरी अशा ट्रॅफीक हवालदारां जवळ ओरिजिनल शासकीय व खाजगी बनावट अशी दोन प्रकारची पावती पुस्तके असण्याचाही विषय गाजला होता. एका वाहतूक कर्मचार्‍याने तर कोर्टातच वाहतूक विभगाच्या प्रचंड वसूलीचा लेखाजोखा मांडला होता. पर राज्यातील वाहन क्रमांकाच्या गाडीला शिट्टी मारून थांबविणे हा तर या मंडळीचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. ट्रकवाले तर जागोजागी लुट करण्यासाठीच असतात. असा चेकपोस्ट वाले, एसटीबी वाले , वाहतूक पोलिस व अन्य सर्वांचा समज असतो. बन्याचदा कागदपत्रे पूर्ण असले तरी एन्ट्री द्यावी लागते. मग काही वेळा हे ड्रायव्हर्सही एन्ट्री घेणार्‍यांना इंगा दाखवितात. हे वैतागलेले ट्रक ड्रायव्हर्स एकत्र होवून एन्ट्री गोळा करणाऱ्या एसटीबी वाल्यांना हायवेवर पळवून – पळवून मारतात . त्याचे व्हिडिओ शुटींग करून सोशल मीडियावरही टाकतात. पुढे आरटीओ , एसटीबी वाले उभे असले तर ड्रायव्हर लोक येणाऱ्या दुसऱ्या ड्रायव्हरांना ‘आगे कुत्ता खडा है , ठोला खडा है ! ‘ असे म्हणून इशारा देवून सावध करतात. वाहन धारक हा मनसोक्त लुटीसाठीचेच ग्राहक असतो , असा शासकीय वसुलीसाठी शासनाचा व खाजगी वसुलीसाठी सर्व यंत्रणांचा पक्का समज असतो. आता हायवेवर जागोजागी लपून छपून ऑटोमॅटिक स्पीडगन लावून वसूलीचा नवा फंडा सुरु करण्यात आला आहे . सुरक्षित प्रवासासाठी स्पीडगन लावण्यासही काही हरकत नाही. पण याप्रकारे घाट उतारावर व जाळे टाकून सावज अडकविण्याची जी घाणेरडी प्रवृती आहे, ती चुकीची आहे . वास्तविक या ऑटो स्पीडगन ची मोहिम सुरु करण्या अगोदर हायवेवर दर दहा किमीवर स्पीड लिमिटचे फलक लावणे आवश्यक आहे. हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पीड लिमिट असतात . सरळ रस्त्यावर वेगळे स्पीड लिमिट. शहरी , ग्रामीण वस्ती सुरु होते तेव्हा वेगळे स्पिड लिमिट , डोंगराळ भागात , घाटात वेगळे स्पिड लिमिट , शैक्षणिक संकुल लगत वेगळे स्पिड लिमिट , कॅन्टॉनमेंट एरीयात वेगळे स्पिड लिमिट , अभयारण्य परिसरात वेगळे स्पिड लिमिट असते . आपण गाडी चालवत आहोत त्या सेक्शन मध्ये मान्यताप्राप्त स्पीड लिमिट काय आहे ? हे गाडी चालकास कळण्यासाठी जागो जागी फलक लावणे यांना आवश्यक आहेत.जर असे फलकच लावलेले नसतील व चालकाला आपण चालवत असलेल्या सेक्शन मध्ये स्पीड लिमिट काय आहे , हे माहितच नसेल तर लिमिटच्या वर एक दोन किमी गेले तरी सापळा लावून त्याच्याकडून एकतर्फी भरमसाठ वसूली केली जात आहे.स्पीडगनवाले लहान गाडी ९० किमी , ट्रक व दुचाकी ७० किमी वर दंड वसूल करतात असे म्हटले जाते . राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण वाले आमचा रस्ता शंभर एकशे दहा स्पीडवर गाडी चालविण्यासाठी बनला आहे असे म्हणतात.

केंद्रिय रस्ते मंत्री ना . नितीन गडकरी तर औरंगाबादहून सोलापूर चार तासात पोहोचणार असे म्हणतात. देशभरातच ते असे कुठून कुठे किती कमी वेळात पोहोचणार याचे मंत्री म्हणून अधिकृत आकडे जाहिर करतात. त्या आकड्यांचे व अंतराचे गणित लावले तर ते सर्व शंभर व शंभर च्या वरचेच स्पीडचे आकडे असतात . हे कसे काय ? हे स्पीडगन वाले बरोबर आहेत , की मंत्री महोदय ? हे कुणी ठरवावे ? नागरिक स्पीडगन वाल्या अधिकाऱ्यांना विचारतात , की जागोजागी स्पीड लिमिटचे फलक न लावताच तुम्ही सापळे लावल्यागत ही वसुली कां करतात ? त्यावर ते उतर देतात , की ” असे स्पीड लिमिटचे जागोजागी फलक लावण्यासाठी आम्ही टोल प्लाझा वाल्यांना पत्रे दिली आहेत . ” मग प्रत्यक्ष असे फलक लावले जाण्याआधीच तुमची वसूली कां सुरु आहे ? या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे . पण काही नाही ! सर्व एकतर्फी मामला आहे! आधीच प्रचंड वैतागलेल्या जनतेला अजुन किती वैताग देणार ? सहन शक्तीची किती परिक्षा पाहणार ?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button