महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या वतीने पत्रकारांना सोयी सुविधा नाकारणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध-संजय बोर्डे
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : कोरोना काळात आपले प्राण गमावून सुद्धा पत्रकार आपले कर्तव्य बजावत आहे यामध्ये बऱ्याच पत्रकारांना कोरोना होऊन त्यांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. परंतु या शासनाने त्यांच्या परिवाराला कुठलीही मदत केलेली नाही. याउलट पत्रकार व पत्रकारांच्या परिवाराची फरफटच केले आहे.
प्रशासन सांगेल तशी मान डोलावणाऱ्या ठाकरे सरकारने पत्रकारांचा धसका घेतला आहे का, अशी परिस्थिती दिसत आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेत सरकारी, महापालिका आणि आरोग्य कर्मचारी यांचा समावेश करताना या सेवेतून पत्रकारांना पुन्हा एकदा वगळण्याचा खोडसाळपणा राज्य सरकारने केला आहे. यामुळे केवळ महाराष्ट्रात लोकलसह सार्वजनिक वाहतुकींमधून प्रवास करण्यास पत्रकारांवर बंदी आणण्यात आली आहे. याआधी खूप विनंत्या केल्यानंतर अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना लोकल प्रवास करण्यास परवानगी होती. मात्र यावेळी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची सुद्धा या सरकारने कोंडी केली आहे. याचा महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
कोरोना योद्यांसारखे काम करूनही सर्व पत्रकारांना प्रवास करण्यास बंदी घालून त्यांच्या माध्यम स्वातंत्र्यावर पुन्हा एकदा गदा ठाकरे सरकारने आणली आहे. मागच्या लॉकडाऊनवेळी सुद्धा असाच निर्णय घेतल्यामुळे पत्रकारांचे मोठे नुकसान झाले होते. पत्रकारांना लोकल प्रवासापासून रोखू नका, अशी सातत्याने मागणी करण्यात आली होती, पण शेवटपर्यंत ठाकरे सरकारने ढिम्म भूमिका घेतली होती. ठाकरे सरकारच्या या नकारात्मक भूमिकेमुळे पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मागच्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या सल्ल्यानुसार पत्रकारांना लोकल बंदी केली होती. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपल्या जुन्या बॉसची री ओढत पत्रकारांना रेल्वे प्रवास करण्यास बंदी घातली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये प्रवास करण्याची कोणतीही बंदी नाही. निषेधासाठी पत्रकार संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन करावे अशी प्रतिक्रिया या वेळी संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांनी व्यक्त केली