जिल्ह्याला रेडअलर्ट..!मंगळवारी अतिवृष्टी चा इशारा...
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रविवार आणि सोमवार यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुलाब चक्रीवादळामुळे हा इशारा देण्यात आला असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ रविवारी सायंकाळी ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी धडकेल. महत्त्वाचे म्हणजे हे चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे २७ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. वेगाने वारे वाहतील. कोकणात २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान वाऱ्याचा वेग वाढेल. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल.
त्यामुळे महाराष्ट्रात येत्या तीन ते चार दिवसांसाठी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. आणि आता अति वृष्टीमुळे ह्या नुकसानीत भर पडली आहे.
सुरुवातीला कोरडा आणि आता ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.मंगळवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून बुधवारी जिल्ह्याला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.