पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या परिवारास तात्काळ ५० लाख रूपयांची मदत द्यावी
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मागणी
फहिम शेख
नंदुरबार : पुणे येथील टीव्ही ९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाली असताना कुचकामी आरोग्य यंत्रणेमुळे योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला असून शासनाने अद्यापही आर्थिक मदत केलेली नसल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने पांडुरंग रायकर यांच्या परिवारास शासनाने ५० लक्ष रूपयांची आर्थिक मदत तात्काळ द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार धडगाव मार्फत जिल्हाधिकारी यांना देवून तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून दोषीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. रायकर यांचा दुर्दैवी मृत्यू म्हणजे प्रशासनाच्या कुचकामी यंत्रनेमुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाव असून ही अतिशय निंदनीय बाब आहे. रायकर मृत्यू प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार असेल तर त्याचं स्वागतच आहे मात्र पुन्हा अशी वेळ कोणत्याही पत्रकारावर येणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी व पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांचा आधार हिरावला गेला असून त्यांना आधार देण्यासाठी शासनाने तातडीने ५० लाखांचे अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष शरद पाडवी,जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र वळवी,धडगाव तालुका कार्याध्यक्ष सुकदेव पावरा, तालुका समन्वयक काळुसिंग पावरा, सचिव धिरसिंग वळवी, अक्कलकुवा अध्यक्ष प्रभू तडवी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.