राज्यात करोना रुग्णसंख्येत मोठी घट..महाराष्ट्र होणार मास्कमुक्त..!मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले
लसीकरण वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना
मुंबई / रायगड : मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या कमी होत असून, तिसरी लाट जवळजवळ संपुष्टात आल्याचे चित्र आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेले निर्बंध शिथील होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यातच करोना आणि मास्कमुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. करोना अद्याप संपलेला नाही. मास्कमुक्ती कधी मिळणार असे प्रश्न आता विचारले जात आहेत. मात्र, त्याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अलिबागमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरण वाढवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिले. करोना अजून संपलेला नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मास्क कधी काढणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. मात्र, त्याबाबत आताच काही सांगता येत नाही. आपल्याला आता जो काही वेळ मिळाला आहे, तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. साथ शिखरावर असताना, लसीकरण करणे कितपत योग्य आहे, हे डॉक्टर आपल्याला सांगतीलच. पण आता लाट कमी होत असताना, लसीकरण वाढवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. लसीकरणानंतरही करोनाचा संसर्ग होतो. पण त्याची घातकता कमी होते, जीव वाचवण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.