दिंडोरी प्रणित समर्थ सेवा मार्गाचा शेतकऱ्यांचा बांधावर होणार कृषी जागर
सुनील घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
ता.२० :- श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरच्या अंतर्गत काम करणाऱ्या कृषिशास्त्र विभाग व कृषी अभियानाच्या वतीने २४ जानेवारी २०२२ रोजी कोरोना नियमांचे पालन करून एक दिवसीय कृषी जागर तर २५ ते २७ जानेवारी २०२२ या कालावधीत विभागवार कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सेवा मार्गाच्या कृषी अभियानाचे प्रमुख आबासाहेब मोरे यांनी दिली.
गेल्या १० वर्षांपासून समर्थ सेवा मार्गाच्या कृषी विभागाच्या वतीने नाशिक मध्ये भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत होते. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे मानसिक आर्थिक बळ वाढवून त्याचा उत्कर्ष साधण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. लाखो शेतकरी व अभ्यासक, पत्रकार, तज्ञ, विद्यार्थी, या महोत्सवात सहभागी होत असत पण गेल्या दोन वर्षांपासून या भव्य महोत्सवाचे आयोजन कोरोनामुळे रद्द करून आता प्रत्येक गावागावात छोटेखानी कृषी जागराचे कार्यक्रम कृषी जागराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देऊन आबासाहेब मोरे म्हणाले कि या जागरात गावागावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कृषी, आरोग्य, पशुसंवर्धन अधिकारी, या सह शेतकरी, ग्रामस्थांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.
यंदाच्या कृषी महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, १० राज्य, तसेच ५ देशात दि. २४ जानेवारी रोजी कृषी जागर झाला कि त्यास जोडून प्रत्येक विभागात विभागीय कृषी महोत्सवांचे आयोजन करण्यात आले असून कोरोना पार्श्वभूमीवर या महोत्सवातील उपस्थिती मर्यादित असेल. विषमुक्त शेती, गावरान बी-बियाणे, घरगुती खते-औषधे, जीवाणू कल्चर, शेतीपूरक जोड व्यवसाय, शेतकरी व बचत गट, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती, अशा विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन मिळेल. दि. २४-२७ जानेवारी २०२२ ह्या कालावधी मध्ये Krushi Mahotsav आणि Dindori Pranit Seva Marg ह्या युटूब चॅनेल वरून विविध तज्ञांचे मार्गदर्शन थेट पाहण्यास मिळणार आहे.कृषी महोत्सवास जोडून शेतकरी कुटुंबातील विवाह इच्छुक मुला-मुलींची मोफत नोंदणी करून विनाहुंडा विवाहासाठी त्यांना प्रेरित करण्यात येईल. तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी माऊली पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.