भारतीय रेल्वे लवकरच ‘हरित रेल्वे’,देशभरातील डिझेल इंजिनचा वापर बंद..!
२०३० पर्यंत कार्बन उर्त्सजन शून्यावर आणण्याचे लक्ष्य………
नागपूर : रेल्वेने संपूर्ण देशातील ब्रॉडगेजचे विद्युतीकरण पुढील दीड वर्षभरात पूर्ण करण्याचे आणि २०३० पर्यंत धावत्या गाडीतून निघणारे कार्बन शून्यावर आणून हरित रेल्वेचा दर्जा मिळवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
करोनामुळे रेल्वे प्रवासी गाडय़ांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बऱ्याच अंशी कार्बनचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय रेल्वकडूुन सुमारे दोन दशकापासून जैव शौचालय, ब्रॉडगेज, विद्युतीकरण आणि मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर होणारे अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
आता या सर्व उपक्रमांना गती प्राप्त झाली असून देशातील ब्रॉडगेज मार्गाचे १०० टक्के विद्युतीकरण २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर देशातील डिझेल इंजिनचा वापर बंद करून कार्बन उर्त्सजन शून्यावर आणण्याचे नियोजन आहे, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले.
मध्य रेल्वेने गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रात १८९५ किलोमीटर, मध्य प्रदेशात १४५ किलोमीटर आणि कर्नाटकामध्ये १९३ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण केले आहे.
एकूण ५५५ किलोमीटर ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण सुरू आहे.
रेल्वे रुळावर येऊन प्राण्याचे जीव धोक्यात येऊ नये म्हणून अंडपास तयार करण्यात आले आहेत.
पाण्याचा पुर्नवापर, कागदाची बचत या सारखे उपक्रम हाती घेऊन रेल्वेला पर्यावरण पुरक करण्याचे धोरण असल्याचेही प्रवीण पाटील यांनी सांगितले.
२ हजार ३०० कोटींची बचत भारतीय रेल्वे हेड ऑन जेनरेशन सिस्टम देखील सुरू करीत आहे. या प्रणालीमुळे रेल्वे इंजिन (लोकोमोटिव्ह)च्या माध्यमातून थेट अव्हर हेड इक्विपमेंटने रेल्वे डब्यांना वीजपुरवठा केला जाणार आहे.