Nashik

भुजबळ साहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

भुजबळ साहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून त्यांना निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमवीर सिंग देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी केला आहे. लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होत आहे. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जातोय, हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज नाशिक जिल्हयात दाखल झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी आलेल्या अभिप्रायचे वाचनही जयंत पाटील यांनी केले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. भुजबळ साहेबांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आले असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. भुजबळसाहेबांसारखे नेतृत्व जपण्याचे काम आपण केले आहे. आपले फक्त ५४ आमदार आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे यापेक्षा जास्त निवडून आणण्यासाठी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. भुजबळ साहेब अफाट काम करत आहेत. त्यांच्या विभागाची शिवभोजन थाळी योजना देशभर गाजत आहे. हे काम आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायला हवं. आपले संघटन मजबूत असेल तेव्हा हे शक्य होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग यशस्वी झाला तो भुजबळ साहेबांच्या पाठपुराव्याने… त्यामुळे भुजबळसाहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले.

मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून पाऊस जरा जास्तच पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहत आहे. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्रनाना पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जेष्ठ नेते अंबादास बनकर , अरूण थोरात , विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्षा राजश्री पहिलवान, जिल्हा परिषद सदस्य महेन्द्रशेठ काले , संजय बनकर , न.पा.गटनेते प्रविण बनकर , तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, युवानेते मकरंद सोनवणे , शहराध्यक्ष दिपक लोणारी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, शहराध्यक्ष सचिन सोनवणे ,सामाजिक न्यायविभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत सिरसाट,शहराध्यक्ष सुभाष गांगुर्डे , डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी,शहराध्यक्ष डॉ.चंन्द्रशेखर क्षत्रिय, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकबर शहा,शहराध्यक्ष निसारभाई शेख , लिंबूवाले येवला संपर्क प्रमुख बाळासाहेब लोखंडे, महिला तालुकाध्यक्षा सोनाली कोटमे, युवक तालुकाध्यक्ष मोहन शेलार, मुशरीफ शाह, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button