सरकारची निष्क्रियता मराठा समाजाच्या मुळावर आली : आ. विनायक मेटे
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : दीड महिना झाला आरक्षण रद्द होऊन ठाकरे सरकारने एकही पाऊल उचललं नाही, ही सरकारची निष्क्रियता मराठा समाजाच्या मुळावर आली आहे, असे मत आमदार विनायक मेटे यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
विनायक मेटे म्हणाले, संभाजीराजे छत्रपती यांचे महाविकासआघाडी सरकारशी चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे मित्र आहेत. त्यामुळे आता संभाजीराजे यांनीच सरकारवरील दबाव वाढवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले.
यावेळी त्यांनी 26 जून रोजी औरंगाबादमध्ये मराठा आरक्षण संघर्ष समितीचा पहिला मेळावा घेणार असल्याची घोषणा केली. हा मेळावा राज्य सरकारचे वाभाडे काढणारा असेल. शासनावर आमचा काडीमात्र विश्वास राहिलेला नाही.
दीड महिना झाला आरक्षण रद्द होऊन ठाकरे सरकारने एकही पाऊल उचललं नाही, ही सरकारची निष्क्रियता मराठा समाजाच्या मुळावर आली आहे. याचा संताप मराठा समाजाच्या तरुण पिढीत पाहायला मिळत आहे, त्याच प्रतिबिंब बीडच्या मोर्चात पाहायला मिळालं आहे.
पण त्यानंतर मुख्यमंत्री घाईघाईने दिल्लीला गेले आणि मराठा आरक्षणाबाबत काहीतरी करतोय असं नाटक करण्याचं काम त्यांनी केलं, बाकी काहीही त्यांनी काहीही केलेलं नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला.