Maharashtra

प्रबोधनकारांचं बहुजनवादी हिंदुत्व आणि उद्धव-राज यांची फसलेली राजकीय धोरणे

प्रबोधनकारांचं बहुजनवादी हिंदुत्व उद्धव आणि राज ठाकरे स्वीकारतील का?
प्रबोधनकार ठाकरे यांचा आज स्मृतिदिन.

संकलन प्रा जयश्री साळुंके

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे सप्टेंबर 17 1885 – 20 नोव्हेंब 1973 हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त राष्ट्र चळवळी चे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र आहेत.

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली.

सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.

समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची भूमिका मांडली.

त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.

प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.

प्रबोधन पाक्षिक

प्रबोधन पाक्षिक काढण्यापूर्वी ठाकरे यांच्या सार्वजनिक कार्यांची चर्चा सर्वत्र झाली होती. सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा ठाकरे यांचा निर्णय अभ्यासपूर्ण होता. इतिहाससंशोधक वि.का. राजवाडे यांनी कायस्थ प्रभूंबाबत काही विधाने केली होती. त्यावर कोदण्डाचा टणत्कार (१९१८) हा ग्रंथ लिहून त्यांनी राजवाडे यांची विधाने ऐतिहासिक पुरावे देवून खोडून काढली होती. या प्रकरणी जागृतीसाठी महाराष्ट्रभर ठाकरे यांनी दौराही केला होता. ब्राम्हणेतर चळवळीकडेही ते त्यानंतर वळले. चळवळी, प्रचार करायचा, इतरांच्या प्रचाराला उत्तर द्यायचे, तर हाती वृत्तपत्रासारखे साधन हवे. या जाणिवेतून वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. त्यावेळी ते सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करत होते. सरकारी नोकरांना वृत्तपत्र चालविण्यास बंदी होती. पण ठाकरे यांनी तशी परवानगी मिळवली. त्यानंतर १६ ऑक्टोबर १९२१ रोजी केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पत्र पाक्षिक होते. पत्राच्या नावाबरोबरच उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत असे संस्कृत वचन होते. त्याबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि नैतिक गोष्टींना हे पत्र वाहिले असल्याचा उल्लेखही इंग्रजीत होता.

या प्रबोधन मासिकामुळे के.सी. ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जाऊ लागले.

परप्रातीयांना विरोध

मुंबईत परप्रांतीय, विशेषत दाक्षिणात्य मंडळी मोठ्या संख्येने येऊ लागली. त्यामुळे मराठी माणसांची गैरसोय होऊ लागली. त्याला प्रबोधनने १९२२मध्ये सर्वप्रथम तोंड फोडले. तसेच, पत्राच्या पहिल्या अंकापासूनच कवी वसंतविहार यांच्या समाजहितवादी कविता त्यात प्रसिद्ध होत असत. प्रबोधनचा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसार झाला. १९२३मध्ये मुंबईत बसलेले बस्तान मोडून प्रबोधन साताऱ्यात स्थलांतरित झाले. तेथील काही कटु घटनानंतर ठाकरे पुण्यात आले. तेथे ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादात तेही पडले. काही ब्राह्मण मंडळींनी डिवचल्यामुळे पुण्यात छापखाना उभारून ठाकरे यांनी प्रबोधन मासिक स्वरूपात आणि लोकहितवादी हे साप्ताहिक सुरू केले. साहजिकच, पुण्यातल्या वादात ठाकरेही उतरले. म. ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात ठाकरे यांनी परखडपणे पुतळाविरोधकांचा समाचार घेतला. पण अखेर कंटाळून त्यांनी पुणे सोडले. मासिक व साप्ताहिकही १९२६मध्ये बंद पडले. ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी स्वत वर्तमानपत्र काढले नाही. पण अनेक वृत्तपत्रांत ते वेळोवेळी लिहित राहिले

कोण होते प्रबोधनकार?
बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरेंचे वडील. उद्धव आणि राज ठाकरेंचे आजोबा. स्वतःला सापडलेल्या काळाच्या तुकड्यावर या चार ठाकरेंनी स्वतःची लहानमोठी मुद्रा उमटवलीय. त्यामुळे ही उत्तरं स्वाभाविक आहेत.

फक्त प्रबोधनकार ठाकरे यांची ही ओळख तिथेच थांबणं चुकीचं आहे एवढंच. त्यांच्या प्रबोधनकार असण्याबद्दल आदर असणाऱ्यांना त्यांच्या ठाकरे असण्याचं वावडं आहे आणि त्यांच्यावर ठाकरे म्हणून प्रेम करणाऱ्यांना त्यांच्या प्रबोधनकार असण्याचा विटाळ आहे. त्यामुळे आपापल्या चौकटींत बसवण्यासाठी आटापिटा करणाऱ्यांचा प्रबोधनकारांना अख्खं स्वीकारण्यात अडचणच होते.

बाळासाहेब ठाकरेंनंतरची शिवसेना : आव्हानं आणि संधी
‘बेरोजगार मराठा तरुणांनी नेतृत्व करण्याची हातची संधी घालवली’
मग आपापल्या सोयीच्या प्रबोधनकारांचा तुकड्या तुकड्यातला वारसा पुढे नेला जातो. सगळ्याच महापुरुषांचं असं होतं. पण प्रबोधनकारांच्या बाबतीत ते अधिक ठळक आहे. कारण अगदी टोकाचे विचार त्यांच्या लिखाणात आणि जगण्यातही सहज एकत्र बागडताना सापडतात.
दैनिक सामना’ने आज प्रबोधनकारांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केलं असेलच. आजवरचा अनुभव पाहता त्यात प्रबोधनकारांचा उल्लेख `थोर समाजसेवक, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी, साहित्यिक, नाटककार, वादविवादपटू, प्रभावी वक्ते, झुंझार पत्रकार’ असा असतो.

ही विशेषणं आज आपल्या सगळ्यांच्याच सोयीची आहेत. पण बहुजनवादी विचारवंत आणि विद्रोही इतिहासकार ही त्यांची ओळख त्यांच्या व्यक्तित्वाशी अधिक जुळणारी आणि जास्त महत्त्वाची आहे. त्याच भूमिकेतून प्रबोधनकारांनी महाराष्ट्राचे विचार आणि कृती, इतिहास आणि भूगोल याला नवं वळण दिलंय.
बाळासाहेबांमुळे प्रबोधनकारांची आठवण महाराष्ट्रात जागती राहिली. तसं झालं नसतं तर प्रबोधनकार सत्यशोधक आणि ब्राम्हणेतर चळवळीतल्या त्यांच्या इतर सवंगड्यांसारखेच विस्मृतीत हरवले असते, हे निश्चित. तरीही त्यांचं फक्त नाव पुसलं गेलं असतं, त्यांनी महाराष्ट्रावर टाकलेला प्रभाव नाही.

प्रबोधनकारांनी त्यांच्या दीर्घ आयुष्यात महाराष्ट्राच्या समाजजीवनातील मोक्याच्या ठिकाणी गाठी मारून ठेवल्यात. त्यामुळे वरवरच्या मलमपट्ट्या सोडून महाराष्ट्राला वारंवार मुळातल्या जातिभेदांच्या जखमांचा शोध घेत खोलात जावं लागतं.

प्रबोधनकार हिंदुत्ववादी होते का?
प्रबोधनकारांचा वैचारिक वारसा बाळासाहेबांनी आणि त्यांच्या शिवसेनेने चालवला का, याचा विचार करताना प्रबोधनकार हिंदुत्ववादी होते, हे विसरून चालणार नाही. गजाननराव वैद्य यांच्या ‘हिंदू मिशनरी सोसायटी’चे ते एक प्रमुख नेते होते. धर्मचिकित्सा हा प्रबोधनकारांच्या लिखाणाचा गाभा आहे. त्यांनी हिंदू धर्माची जितकी चिरफाड केलीय, तितकी फार कमी जणांनी केली असावी.

राज ठाकरे आणि मनसेचं ‘नवनिर्माण’ ठाण्यातून होईल का?
मी मनसे आणि राज ठाकरेंना सोडलं कारण की…
अत्यंत निर्दय शब्दांत त्यांनी हिंदू धर्मातल्या ब्राम्हणी जातवर्चस्ववादी मानसिकतेवर टीका केलीय. `आजचा धर्म हा हिंदूधर्मच नाही. प्रचलित भिक्षुकशाही धर्म हा बुळ्याबावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारं एक पाजी थोतांड आहे,’ या त्यातल्या त्यात सोबर वाक्यातून प्रबोधनकारांच्या ब्राम्हणशाहीवरील हल्ल्याची कल्पना येऊ शकते.
पुरोहितशाही हे हिंदू धर्माच्या आणि पर्यायाने देशाच्या अवनतीचं सर्वांत महत्त्वाचं कारण असल्याचं त्यांनी वारंवार मांडलंय. तेच प्रबोधनकारांचं हिंदुत्व असल्याची मांडणी ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांनी ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ या पुस्तकात केलीय. स्वतः हिंदू आणि हिंदुत्ववादी बनून हिंदू धर्मातल्या ब्राम्हणी वर्चस्वावर कोरडे ओढण्याचा प्रबोधनकारांचा पवित्रा अनेक हिंदुत्ववाद्यांसाठी अडचणीचा आहे.

‘राज’कारणाला कलाटणी देणाऱ्या 14 घटना
भारतातला मध्यमवर्ग खरंच गरीब आहे का?
‘बहुजनवादी हिंदुत्वाचे मूळपुरुष’ म्हणूनच प्रबोधनकारांचा शोध घ्यायला हवा. या हिंदू धर्माचा खूनच करायला हवा, इथपर्यंत टोकाचा विचार मांडूनही प्रबोधनकार हिंदुत्ववादी राहतात. कारण ते ना हिंदू धर्माचा विरोध करतात, ना हिंदुत्ववादाचा. ते विरोध करतात, हिंदुत्वाच्या नावाने बहुजनांचं शोषण करणाऱ्या ब्राम्हणी पुरोहितशाहीचा. ही सारी मांडणी निव्वळ अचाट आहे.

हे करताना ते कुठेच ब्राम्हणी हिंदुत्ववादाच्या वळचणीला गेलेले नाहीत. छत्रपती शाहूंच्या नंतर ब्राम्हणेतर चळवळीत मराठ्यांच्या दादागिरीला कंटाळून किंवा इतर कुठल्या कारणांमुळे वा. रा. कोठारी, रावबहाद्दूर सी. के. बोले यांसारखे ब्राम्हणेतर आंदोलनातले मोठे नेते हिंदूमहासभेत जाताना दिसतात. पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे प्रबोधनकार त्या वाटेकडे ढुंकूनही बघत नाहीत. उलट न. चिं. केळकर, सावरकर या हिंदू महासभेच्या अध्यक्षांवर अनेकदा टीका करतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर त्यांचं टीका करण्यासाठी आवडीचं गिऱ्हाईक असावं, असं त्यांचं लिखाण वाचताना वाटतं. विशेषतः गोळवलकर गुरुजींनी गोहत्येविरुद्ध केलेल्या आंदोलनावर त्यांनी जळगावच्या ‘बातमीदार’ साप्ताहिकात लिहिलेली लेखमाला आजच्या संदर्भात महत्त्वाची आहे.

संघाला विरोध करणारे प्रबोधनकार
बाळासाहेबांनी तोच धागा पकडून ब्राम्हणी हिंदुत्ववादाला केवळ वापरलं. संघाच्या हिंदुत्वाची नेहमी टवाळीच केली. संघवाल्यांना आपल्या जवळही येऊ दिलं नाही. अगदी सुरुवातीच्या काही घटनांनीच सावध होऊन त्यांनी संघवाल्यांना शिवसेनेच्या संघटनेत शिरू दिलं नाही. संघ हाच आपला संघटन बांधणीतला सर्वांत मोठा शत्रू आहे, हे त्यांना पक्कं माहीत होतं. त्यामुळेच बाळासाहेब असेपर्यंत संघ कधीच शिवसेनेपेक्षा वरचढ होऊ शकला नाही. पण आता पारडं पूर्ण फिरलंय.
आजच्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संघ आतपर्यंत घुसला असावा, असं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात वाटलं. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी शिवसेनेचं पहिलं चिंतन शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालं आणि तिथे बाळासाहेबांच्या शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्यासाठी सु. ग. शेवडे बोलावले गेले.

तसंच एकदा थेट सांगलीच्या भिडे गुरुजींना मार्गदर्शनासाठी आणण्याचा प्रयत्न झाला. आज शिवसेनेच्या अनेक शाखांमध्ये प्रबोधनकारांचा फोटो नाही पण सावरकरांचा आहे. राज ठाकरे यांनी दोनेक महिन्यांपूर्वी पहिलं फेसबूक लाईव्ह केलं, तेव्हा सावरकरांचा फोटो वर आणि प्रबोधनकारांचा फोटो खाली होता. उद्धव ठाकरे यांनी या दोनेक वर्षांतच नागपूरला जाऊन मोहन भागवतांची भेट घेतली होती. प्रबोधनकारांचं हिंदुत्व माहीत नसल्याचे हे परिणाम असावेत.

शिवसेनेने गमावला प्रबोधनकारांवरचा हक्क
पण बाळासाहेब असतानाच या घसरणीची सुरुवात झाली होती. प्रबोधनकारांच्या निधनानंतर वर्षभरातच वरळीची दंगल झाली, हा काही योगायोग नव्हता. या दंगलीत शिवसेनेने सवर्णांची बाजू घेऊन दलितांवर हल्ले केल्याचे आरोप झाले.

बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेली मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादाची चलनी नाणी सहज उचलली. पण प्रबोधनकारांच्या जहाल बहुजनवादाचा वारसा बाळासाहेबांनी पुढे चालवला नाही. तो त्यांनी चालवण्याचा थोडाफार प्रयत्नही केल्याचे संदर्भ सापडतात. पण तो बहुधा त्यांना पेलवला नसावा. प्रबोधनकारांनी बहुजनवादापायी स्वतःला पणाला लावून आयुष्याची ससेहोलपट करून घेतलेली त्यांनी पाहिली होती. त्याचा तो परिणाम असावा.
बाळासाहेब स्वतः जातनिरपेक्षच जगले. याचा अर्थ त्यांना जात माहीत नव्हती असं नाही. महाराष्ट्रातल्या जातींचा इतिहास आणि भूगोल तळहातावरच्या रेषांपेक्षाही चांगला माहीत असलेल्या प्रबोधनकारांचे ते सुपुत्र होते. शिवसेनेच्या राजकीय प्रवासात त्यांनी जातीची ही समज नीट वापरली. काँग्रेसने मराठा, मुस्लिम आणि महार या थ्री एमचं राजकारण केलं.

याच तीन समाजघटकांना विरोध करत बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्रात पसरवली. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबेंनी शिवसेनेच्या जातीय बांधणीची नस बरोबर पकडलीय. ते सांगतात, ‘मराठेतर सवर्ण आणि महारेतर अस्पृश्य यांनी आपापल्या जातिसमूहांविरुद्ध केलेलं बंड म्हणजेच शिवसेना.’

पण राजकारणात यशस्वी होण्यासाठी बाळासाहेबांना प्रबोधनकारांच्या विचारांपासून दूर जाण्याची किंमत मोजावी लागली. बाळासाहेबांनी रिडल्सला विरोध केला तेव्हा शिवसेना प्रबोधनकारांच्या धर्मचिकित्सेपासून तुटली. तरीही ती शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग करू शकत होती.

उद्धव-राज धडा घेतील?

पण बाळासाहेबांनी या कसरती केल्या तशा त्यांच्या नंतरच्या पिढीत होण्याची शक्यता कमी आहे. आमचं हिंदुत्व हे घंटा जानव्याचं नाही, हे उद्धव ठाकरे भाजपवर टीका करताना आजकाल बऱ्याचदा सांगतात. आदित्य ठाकरेही ते सांगू लागले आहेत. पण हे हिंदुत्व घंटा जानव्याचं नाही, म्हणजे नेमकं काय, ते सांगण्यासाठी त्यांना प्रबोधनकारांकडे जावं लागेल.
भाजपच्या यशस्वी झंझावातात टिकून त्याला उत्तर द्यायचं असेल तर प्रबोधनकार शोधावे लागतील. अफाट यश मिळवल्यानंतर आज आपल्याबरोबर कोणीही का नाही, हे समजून घ्यायचं असेल तर राज ठाकरेंना प्रबोधनकारांकडे जावं लागेल. मनसेच्या झेंड्यावरचे रंग केव्हाचेच उडून गेलेत. त्या झेंड्यात अपेक्षित सोशल इंजिनिअरिंग हवं असेल तर राज ठाकरेंना बाबासाहेब पुरंदरे नाही, तर प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेला इतिहास समजून घ्यावा लागेल.

बाळासाहेब ठाकरेंच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वात त्यांच्या सामाजिक विचारांची बैठक नेहमीच झाकली गेली. त्यात त्यांच्या राजकारणातल्या यशाचं रहस्य आहे. इतकी वर्षं टिकून राहण्यामागे त्यांची सामाजिक समज कारणीभूत आहे.

उद्धव किंवा राज ठाकरे यांना मराठी अस्मितेचं राजकारण टिकवून ठेवायचं असेल तर जातजाणिवांशी ट्युनिंग जुळवावंच लागेल. नाहीतर बाळासाहेबांच्या निधनाला पाच वर्षं झाली आणि त्यांचं स्मारकही महाराष्ट्रात उभारलं गेलं नाही, अशी आश्चर्यं घडत राहतील. बॅक टू बेसिक्स शिवाय शिवसेना-मनसेला पर्याय नाही. तो पाया प्रबोधनकार आहे. टिकायचं असेल तर त्यांना तिथे जावंच लागेल.आदित्य ठाकरे च नाव टाकायचं एकूणच आजच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता ठाकरे बंधू आपल्या आजोबांनी केलेल्या विसरले आहेत.राजकीय च नव्हे तर प्रबोधनकार यांनी दिलेली शिकवण ही विसरले आहेत.आत्म चिंतन करण्याची गरज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button