कोरोनाचा जबर फटका अफवांमुळे चिकन खरेदीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
लातुर प्रतिनिधी:- प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-
कोरोना व्हायरसपेक्षा अधिक वेगाने पसरलेल्या अफवांचा फटका चिकन बाजाराला बसत आहे.
पूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना रोगाच्या भितीमुळे औसा तालुक्यासह ग्रामीण भागातील पोल्ट्री उद्योग प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.
मांसाहारप्रेमींनी चिकन खाणं बंद केल्यामुळे दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पोल्ट्रीफार्मसह चिकन बाजाराला कोट्यवधींचा फटका बसत आहे.
चिकन खाण्याने कोरोना होत असल्याच्या अफवा या सोशल मीडिया आणि व्हाट्सअप्प वर फिरत आहेत.
चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते, अशी चुकीची माहिती सोशल मीडियातून पसरली आणि व्हायरसच्या भीतीने मांसाहारींनी अचानक चिकन खायचे बंद केले.
अंडी उत्पादनाचा खप सध्या निम्मा झाला आहे. यामुळे पोल्ट्रीफार्म धारक मोठ्या अडचणीत सापडले असून या व्यवसायला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.
चिकनची मागणी घटल्याने चिकन विक्रेते तर अडचणीत आले आहेतच, मात्र पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांवरही संकट ओढावलं आहे . मांसाहार करणाऱ्यानी चिकन खरेदीकडे पाठ फिरवली असल्याने चिकनचे दर प्रचंड घसरले आहेत. औसा तालुक्यातील लामजना या ग्रामीण भागात एक किलो चिकन अवघ्या ८० ते ९० रुपये किलो भावाने मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे आर्थिक संकट उभे राहल्याने नुकसानी मध्ये भर पडत आहे. पोल्ट्री उद्योगांचे होणारे नुकसान कसे भरून काढायचे ? त्याला जबाबदार कोण ? यावर कोणता मार्ग काढता येईल हा प्रश्न सर्व पोल्ट्री व्यवसायिकांच्या वतीने विचारला जात आहे.कोरोना या भयानक आजाराने अनेकांचे प्राण घेतले आहे. देशासह राज्यभरात या संसर्गजन्य रोगाने सर्वसामान्यांच्या काळजात धडकी भरवली आहे.
दरम्यान, शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांनी पोल्ट्री फार्म सुरु केले आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीने हा जोडधंदा उद्ध्वस्त होण्याकडे वाटचाल करत आहे. ही अवस्था एकट्या औसा तालुक्याची नाही तर राज्यातल्या अनेक जिल्हा तालुक्यात हा अफवेचा व्हायरस झपाट्याने पसरत आहे. मांसाहारींनी अशा अफवांना बळी न पडता चिकन खात राहावं, असं आवाहन केलं जात आहे.
“आपल्याकडे चिकन ज्या पद्धतीने शिजवले जाते, त्यानुसार त्यात कोणतेही विषाणू जिवंत राहत नाहीत. याशिवाय कोंबडी किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कोरोना व्हायरस असल्याची भारतात चिन्हं नाहीत. त्यामुळे चिकन खाणाऱ्यांनी मनामध्ये अजिबात शंका बाळगू नये.”