मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान
६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण;
मराठी चित्रपटाला विविध श्रेणीत १० पुरस्कार
एस एम पारे
नवी दिल्ली 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच ‘पाणी’, ‘नाळ’, ‘चुंबक’, ‘तेंडल्या’, ‘खरवस’ आणि ‘आई शप्पथ’ या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रपटांसाठी एकूण 10 पुरस्कार प्रदान करण्यात आले.
‘नाळ’ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे यास सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा तर प्रसिध्द अभिनेते स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञानभवनात आयोजित कार्यक्रमात आज ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार -2018’ चे वितरण करण्यात आले. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, मंत्रालयाचे सचिव रवि मित्तल आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीचे निवडक परिक्षक यावेळी मंचावर उपस्थित होते.
‘अंधाधून’ चित्रपटासाठी अभिनेता अन्शुमन खुराणा आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशल यांना विभागून उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘महानटी’ या तेलगू चित्रपटातील भूमिकेसाठी किर्थी सुरेश या अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘भोंगा’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा बहुमान
प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेसाठी ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक तथा मंदार- नलिनी प्रोडक्शनचे शिवाजी लोटन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रजत कमळ आणि 1 लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित ‘पाणी’ चित्रपटाला पर्यावरणावरील सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. रजत कमळ आणि 1 लाख 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दिग्दर्शक सुधाकर रेड्डी येंकटी यांना ‘नाळ’ चित्रपटासाठी पुरस्कार
दिग्दर्शकाचा पदार्पणातील चित्रपट म्हणून ‘नाळ’ या चित्रपटाला ‘इंदिरा गांधी पुरस्काराने’ गौरविण्यात आले. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी येंकटी आणि निर्माता तथा मृदगंध फिल्म्सचे नागराज मंजुळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रत्येकी स्वर्ण कमळ आणि 1 लाख 25 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्रीनिवास पोकळे आणि स्वानंद किरकिरे यांच्या अभिनयाचा सन्मान
‘नाळ’ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी चार बालकलाकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘तेंडल्या’ ठरला सर्वोत्तम ध्वन्यांकनाचा मानकरी
‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम ध्वन्यांकनाचा (लोकेशन साऊंड) पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटात ध्वनीच्या माध्यमातून छोट्या शहराच्या वैविद्यपूर्ण रंगछटा दर्शविण्यात आल्या आहेत. लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्ट गौरव वर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
नॉनफिचर मध्येही मराठीचा सन्मान
नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली ‘आई शप्पथ’ या चित्रपटाला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिग्दर्शक गौतम वझे यांनी पुरस्कार स्वीकारला. स्वर्णकमळ आणि 1 लाख 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘खरवस’ हा सर्वोत्तम लघु काल्पनिक चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक आदित्य जांभळे आणि निर्माती संस्था श्री म्हाळसा प्रोडक्शन पोंडा यांना या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘ज्योति’ चित्रपटासाठी सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत दिग्दर्शक केदार दिवेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. रजत कमळ आणि 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘हेल्लारो’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
‘हेल्लारो’ या गुजराती चित्रपटाला देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘बधाई हो’ या हिंदी चित्रपटाला सर्वोत्तम मनोरंजक चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पद्मन’ या हिंदी चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘ओंडाल्ला येराडाल्ला’ या कन्नड भाषेतील चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा नर्गिस दत्त पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अमिताभ बच्चन यांना 29 डिंसेबरला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
भारतीय चित्रपटसृष्टीवर गेल्या 50 वर्षांपासून कसदार अभिनयाने गारूड घालणारे महानायक अमिताभ बच्चन यांना येत्या 29 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याचे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या समारंभात सांगितले.
महानायक अमिताभ बच्चन यांना ‘50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.