India

दिलाचे Talk….वाढत्या आत्महत्या..! Outlet मनाचे..!

Dilache Talk….वाढत्या आत्महत्या..! Outlet मनाचे..!

प्रा जयश्री दाभाडे

गेल्या काही महिन्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.आताच काल परवा समीर गायकवाड या टिकटॉक व इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असणाऱ्या युवकाने आत्महत्या केली.तर प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत ची आत्महत्या मनाला चटका लावून गेली.टिक टॉक स्टार पूजा चव्हाण असो की अगदी आध्यत्मिक गुरू म्हणून ज्यांची ओळख होती ते म्हणजे भय्युजी महाराज यांची आत्महत्या असो..! सर्वच धक्कादायक..! लाखो जीव घेणारा क्रूर हिटलर ने पण आत्महत्याच केली शेवटी..! मनमिळाऊ,सदवर्तनी,प्रेमळ,शांतता प्रिय साने गुरुजी आत्मघात करुन घेतात…? तर मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात..!सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या डाॅ शीतल आमटे/ करजगी आपलं जीवन संपवतात. ही तर सर्व मोठ्या लोकांची उदाहरणे..!ज्यांना लहान थोर,तरुण म्हातारे, युवक युवती फॉलो करतात..!त्यांचे विचार,मत,प्रतिक्रिया, अभ्याससात..!त्यांच्या कडून शिकतात..! मग ह्या सर्व लोकांकडून काय शिकाव ..?आता..सामान्य माणसाची काय कथा..! असंख्य साधारण व्यक्ती कदाचित ह्या मार्गावर जातात..!एव्हढच की मोठ्या लोकांसारख्या त्यांच्या बातम्या माध्यमातून प्रसारित होत नाही..!

मन आणि मनाचा थांग लागणं तसं कठीणच..!वरून शांत असणाऱ्या ह्या मनाच्या समुद्रात खोल वर आत खूप खळबळ माजलेली असते.ह्या समुद्रात असंख्य गोष्टी दडलेल्या असतात..!वर वर पाहणाऱ्याला त्याचा पत्ताच लागत नाही..!आज कालच्या बेगडी जीवनात प्रेम,स्नेह,आपुलकी मरत चालली आहे..!त्याचाच तर हा परिणाम नव्हे..!आज काल स्वतः च दुःख दुसऱ्याला सांगणं म्हणजे देखील गुन्हाच झाला आहे..!पूर्वीही वाद होते,विसंवाद होते,भांडणे होती,संकटे होती,ताण होता..! पण आपपासांत जिव्हाळा, माया प्रेम विश्वास होता..! आज नेमक्या ह्या सर्व गोष्टी कुठे च पहावयास मिळत नाही..! एखाद्या कडे काही सांगावं म्हटलं तर त्याची टर उडविणे,मज्जा घेणे,गुप्तता न पाळणे इ प्रकारांमुळे व्यक्ती दुसऱ्या जवळ आपलं दुःखच सांगत नाही..मनाचा निचराच होत नाही..

कोट्यावधी रूपये खर्च धरण बांधले आणि समजा त्याला outlet च दिले नाही
तर काय होईल अक्षरशः धरण फुटेल..!इतकं महत्वाचं असते
हे waste weir…!गेल्या काही वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात 60 टक्के वाढ झाली आहे. वय वर्षे 15-44 यात आत्महत्या हे मृत्यूच्या प्रमुख तीन कारणांमध्ये आहे. भारतातदेखील तरुणांत आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या करणार्‍यांत 40 टक्के लोक 15 ते 30 वर्षे या वयोगटातील आहेत. यात नुसता प्रयत्न करणार्‍यांची संख्या कितीतरी जास्त आहे. दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण एक भयानक स्वरूप घेत आहे. हे जर का थांबवायचे असेल तर आपण सर्वांना या संदर्भांत काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

व्यक्ती तडकाफडकी आत्महत्येस प्रवृत्त का होतात 20 टक्क्यांहून कमी लोक तडकाफडकी आत्महत्या करतात. उरलेले 80 टक्के मात्र बराच काळ अशा विचारांशी झुंज देत असतात. सुरुवात होते ते कंटाळवाणे व उदास वाटण्यापासून माझ्या मनासारखे काहीच होत नाही, तर हे आयुष्य जगण्यात काय अर्थ. आधी माझे आयुष्य किती आनंदी होते. आता नुसते दु:ख आहे, देव मला मरण का देत नाही. जर मला अपयश येते तर मग मी का जगू. अशा विचारांना stage-1 म्हणूयात.
अशा विचारांच्या जाळ्यात अडकलेली व्यक्ती अर्धवट हिमतीने काही प्रयत्न करतात. उदा. हाताला ब्लेडने छोटे छोटे कट मारून थांबणे, विषारी औषध एखादा घोट पिणे व लगेचच कोणालातरी सांगून दवाखान्यात येणे. रेल्वे पटरीवर जाणे, पण रेल्वे येण्याआधीच घाबरून वापस येणे. दोन ते चार झोपेच्या गोळया खाणे, अशा अवस्थेत त्यांची पूर्णपणे मनाची तयारी नसते.

सर्व बाजूंनी आपण हताश झालो आहोत व सुटकेचा उपाय दिसतच नाही. असे नेहमीच कष्ट सहन करण्यापेक्षा एकदाच काय तो त्रास होऊ दे. असे टोकाचे विचार आल्यास आपण त्याला २ री अवस्था म्हणतो. असे व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करतात व कित्येकजण त्यात यशस्वी होतात. -STAGE- 2 मध्ये असलेले व्यक्ती कसे ओळखावेत, अशा अवस्थेतील व्यक्ती नेहमी निराशावादी व टोकाचे विचार करतात. उदा. मी सर्वांना नकोसा झालो आहे. मी जर गेलो तर इतरांचा त्रास कमी होईल., सतत उदास राहणे, जेवण व झोप कमी होणे, जिवाला धोका होईल असे कृत्य सहन करणे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 90 टक्के लोक आत्महत्या करण्यापूर्वी कोणाला तरी हे सर्व सांगतात.

आत्महत्येची वृत्ती आढळल्यास काय करावे?

तीव्रता काहीका असेना, आत्महत्येच्या विचारांना कधीही सहजतेने घेऊ नेये अशा व्यक्तींना सहानुभूती द्यावी, जेणेकरून त्यांचा एकटेपणा व असाह्यपणा दूर होण्यास मदत मिळते. नातेवाइकाला या गोष्टीची कल्पना द्यावी व त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.

आत्महत्येचे विचार व्यक्तीत येऊच नयेत यासाठी:

आत्महत्येचा विचार हे हताशपणाची शेवटीची पायरी आहे. त्यासाठी सर्वांमध्ये सकारात्मकता रुजली पाहिजे.

हयातीत एकदाही आत्मघाताचा विचार मनात न आणलेला माणूस विरळा. माणूस जन्मतो तोच मुळी जीवना सोबत मरण्याचे अनोखे आकर्षण घेऊन, असे सिग्मंड फ्रॉईडचे मत. स्युसाईड या मूळ लॅटिन शब्दाचा अर्थ स्वत:चा खून. मात्र, जगात हत्यांपेक्षा आत्महत्या अधिक होतात. अनेक अपघात, गूढ मृत्यू हे आत्मघात असतात. मात्र, त्यांची तशी मोजदाद होत नाही. दरवर्षी जगभर सुमारे आठ लाख आत्महत्या घडतात. त्यातील, १७ टक्के म्हणजे एक लाख ३५ हजार केवळ भारतात घडतात. दर तासाला एक विद्यार्थी तर दर अडीच तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. जगात मृत्यूच्या पहिल्या दहा कारणांमध्ये आत्महत्येचा समावेश होतो. म्हणजे केवळ शारीरिक विकारच नाही, तर स्वत:चे मनही माणसाचा बळी घेते

माणूस आत्महत्या का करतो?

आत्महत्या करणारे ९५ टक्के लोक मनोविकारग्रस्त असतात, त्यातलेही ८० टक्के नैराश्य या मनोविकाराचे बळी. मात्र, या नैराश्याची कारणे काय? हा प्रश्न उरतोच. त्यामुळे, आत्महत्येचा प्रश्न नैराश्याइतकाच जटिल. त्यात आयुष्यात अतिरंजित यशाचे मापदंड असणे आणि ते पुरे न करता येण्याचे शल्य बाळगणे इथून सुरवात होऊन अखेर भावनिक सुन्नपणा किंवा बधीरपणा येणे, ही आत्महत्येची अखेरची पायरी असते.

प्रेमात विफलता येते, स्व-प्रतिमेला तडा जातो, तेव्हा अटळ हताशेने माणूस घेरतो. त्यावेळची मनोवेदना कमी करण्याचा मार्ग म्हणजे आत्महत्या. ही मनोवेदना सहन करण्याची प्रत्येकाची शक्ती वेगळी, त्यामुळे तुम्हाला जी समस्या वाटत नाही ती इतरांना वाटू शकते.

अडॉल्फ हिटलर, साने गुरुजी आणि मेरिलिन मन्रो ही पराकोटीची भिन्न व्यक्तिमत्वे, त्यांच्यातील समान धागा म्हणजे आत्महत्या. लौकिक यश गाठले तरी, आत्मघात माणसाचे अपरिहार्य माणूसपण अधोरेखित करतो. आत्महत्येमागे जैविक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, अशा अनेक घटकांचा एकत्रित खेळ असतो.

अशा रुग्णांना द्वंद्वात्मक पद्धतीने भावनिक व्यवस्थापन शिकवणे गरजेचे असते. बहुतांश मानसोपचार पद्धती या संथ काम करतात. मात्र, द्वंद्वात्मक पद्धतीत, मनात आत्मघाताच्या विचारांचा क्षोभ उसळलेल्या रुग्णांसाठी वेगवान उपचारही आहेत. त्यात बर्फाळ पाण्याचे सपकारे मारणे, वीस मिनिटे जोराचा व्यायाम करणे, तसेच स्नायू कमाल ताठ आणि शिथील करणे, श्वास स्थिर करणे असे उपाय आहेत.

उत्क्रांतीच्या वाटचालीत आत्महत्येचे स्थान कुठे आहे? डार्विनच्या ‘नैसर्गिक निवडी’च्या तत्त्वानुसार माणूस स्वत:च्या जिवाला घातक ठरेल असा बदल घडवणार नाही.त्यात भर पडली मनोविकृतींची. खरेतर मानवी जीवनात मनोविकृती ही आत्मघाताचे टोक गाठते. नैराश्य ही आत्मघाताकडे नेणारी मनोवस्था. पण मूलत: ती मदतीची हाक आहे. ही हाक कुणालाही ऐकू येत नाही का..?आत्मघातापासून दूर रहाण्याची धडपडही. ही धडपड कोणालाही दिसत नाही का..? प्रत्येक व्यक्तीचा आत्महत्या करण्या पूर्वीची जर मानसिक अवस्था खराब होते म्हणजेच तिच्या व्यवहारात निश्चितपणे बदल होतो..! कारण नैराश्य कुठलीही कृती करण्याचे कारण शोधते.. आत्मघात करण्याचेही. त्यामुळे, नैराश्यावर उपचार सुरू होताच आत्महत्यांचे प्रमाण वाढते.

त्यात भर अज्ञानाची.आणि खराब मानसिकतेची..!आपल्या कडे एखादा व्यक्ती मानसोपचारतज्ज्ञ कडे गेला की थेट वेडाच म्हणजे मेंटलच ठरतो..!

एव्हढेच नव्हे तर पैसा आहे,यश आहे..!मग कसले आले नैराश्य ..!हा एक भाग..!पैसा,यश ,सुख सोई म्हणजेच जीवन का..? त्यात मन,मानसिक,शारीरिक समाधान ह्यांचा काही विचारच नाही..त्यातल्या त्यात स्त्रियांचा तर दूर पर्यंत विषयच करायचा नाही..! नवरा ,मुलं, ऐशो आराम,सर्व आहे ना मग तक्रार कशाची..? हे च सर्व असत का सुख म्हणजे..? स्वतः ची काही परिभाषा,अभिलाषा नसाव्यात का..? की हेच दुःखा च कारण बनतात..?मग काय नैराश्य वगैरे हे मनाचे खेळ आहेत!’ हे वाक्य या अज्ञानाचं निदर्शक. कारण मनाचे हे ‘खेळ’ मेंदू-रसायने खेळतात. त्यात सुबत्तेचा काही संबंध नाही. सेलेब्रिटींच्या आत्महत्या चर्चेत येतात ते यामुळे. शेतकरी किंवा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ‘साहजिक’ या गटात जातात.

सामान्य माणुस वर वर दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही…. मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या जी आपल्या पर्यंत पोहोचत नसते किंवा त्या आनंदी आणि सुखी चेहेर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो.

शेवटी काय…?? Outlet आवश्यक..!

मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला.प्रत्येक व्यक्तीजवळ आपल्या मनातील “स्ट्रेस” बाहेर काढायला त्याच्या जवळ “outlet” असणे आवश्यक आहे..!

का इतकं महत्वाचं असतं का हे outlet ?खरंच खूप महत्वाचं असत outlet..?बोला मोकळे व्हा..! कोण काय बोलेल,म्हणेल याचा विचार न करता आयुष्य जगताना स्वतःच्या मर्जीने जगण्याचा अधिकार आणि हक्क प्रत्येकाला आहे.अर्थात समाज त्यावर अनेक बेगडी बंधने घालत असतो ..!व्यक्त व्हा..! मनाचा निचरा करा..!

आपले प्रश्न विचार मत नि:संकोच पणे सांगा..! शेअरिंग इज केअरिंग…Sharing Is Careing तुमचं मन हलक करा..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button