धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी आरोप फेटाळून लावले.. धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी आरोप फेटाळून लावले…
धरणगाव : धरणगाव येथील तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यावर समाजमाध्यमद्वारे खंडणी, धमकाविणे, शिवीगाळ करणे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना त्रास देणे. याबाबत आरोप करण्यात आले आहे.
याबाबत धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सांगितले की, वरील आरोप करणाऱ्यांनी आधी आपले आत्मपरीक्षण करावे. सद्यस्थितीत समाजमाध्यमांवर माझ्या विरोधात प्रतिक्रिया पोस्ट व्हायरल होत आहेत. हे सर्व हेतुपुरस्कर व राजकीय सुडनाट्य सुरू आहे. असे आरोप करणे अतिशय गलिच्छ आणि लाजिरवाणं आहे. ज्या वाळु माफियाला वाचविण्याचा प्रयत्न तथाकथित राजकीय व्यक्ती करत आहेत, ते गेल्या कित्येक महिन्यापासून मला या बेकायदेशीर कामाला प्रवृत्त करत होते. परंतु मी माझ्या अधिकारात वैध नसलेले कामे केली नाहीत. म्हणून आरोप करणाऱ्यांनी हे खोटे – नाटे आरोप करायला सुरुवात केली आहे. हे केवळ आणि केवळ राजकीय द्वेषातून सुरू आहे, यापूर्वी मी माझ्या प्रशासकीय सेवेत बेकायदेशीर कामे केलेली नाहीत. व पुढेही अश्या अवैध कामाला खतपाणी घातले नाही, व घालणार नाही. तसेच, आरोप करणारे राकेश नन्नवरे नावाचा व्यक्ती म्हणतोय की माझा वाळू रेती व्यवसायाशी काहीही संबंध नाही, हा किती हास्यास्पद मुद्दा आहे. ही व्यक्ती आपली वाहने सोडविण्यासाठी वारंवार तहसील कार्यालयात येणे सुरू राहायचे, व ज्या व्यक्तीवर अवैध वाळूचे दंड चलनद्वारे भरले आहेत. यावरून त्यांचे निराधार आरोप समोर येत आहे. तसेच यापूर्वीच्या तहसीलदार यांनी तर त्यांच्याविरुद्ध पो. स्टे. धरणगाव येथे गुन्हा दाखल केला आहे, अशा व्यक्तीने वाळू व्यवसायाशी काहीही संबंध नाही, असे म्हणावे यावरूनच यांचा खोटेपणा सिद्ध होतो. आणि अशा बेकायदेशीर कामांसाठी जर कुणी दबावतंत्राचा वापर करत असणार! तर मी अश्या विषयावर कसे शांत बसणार..?
वरील आरोपात माझ्यावर जातीविषयक शिवीगाळ करणे असे, आरोप लावले गेलेत. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी प्रत्येक जाती- धर्माला मानणारा, व समतावादी व्यक्ती आहे, मी आजपावेतो कधीही कुण्या व्यक्तीवर जातीवाचक वा जात धर्म पाहून वागलो नाही, म्हणून शिवीगाळ, व अपशब्द वापरणे, असले शब्द माझ्या मानसिकतेत व तत्वात बसत नाही. माझ्यावर केलेला आरोप धादांत खोटा आहे.
मी ज्या दिवसापासून प्रशासन सेवेत रुजू झालो, त्यादिवसापासून एकही गोरगरीब, शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी, विधवा भगिनी, जेष्ठ नागरिक, निराधार, अनाथ मुलं, घटस्फोटीत, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्रिया, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी विधवा वेतन असे वरील कामे आजपर्यंत प्रलंबित राहिले नाही, किंबहुना ते तात्काळ करण्यावरच माझा भर राहिलेला आहे.
धरणगाव तालुक्यात राष्ट्रीय कुटुंब, अर्थसहाय्य योजना, शेतकरी आत्महत्या वारसांना शासकीय धनादेशसोबत साडी, चोळी, एक महिन्याचा किराणा, शिलाई मशीन, पिठाची गिरणी वाटप करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व लागणारे साहित्य, खाऊ वाटप, तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी MPSC चे एकदिवसीय शिबिर व मोफत मार्गदर्शन केले. असे वरील कार्य माझ्यापरीने कितीतरी पटीने अधिक केले आहेत, व पुढील काळातही प्रयत्न करीत राहील.
सद्यास्थितीत कोरोना सारख्या जीवघेण्या साथी रोगाचा काळात कोविड सेंटर उभारले, त्यात सर्व रुग्णांची व्यवस्था, जेवण, नाश्ता, फळे वाटप, हळदीचे दूध वाटपाचा कार्यक्रम केला आहे, आणि वेळोवेळी रुग्णांना भेटी दिल्या आहेत. कोविडच्या रुग्णांना ऑक्सिजन बेड ची व्यवस्था, लसीकरण, रुग्ण तपासणी ह्या सर्व कार्यावर भर देण्याचा प्रयत्न करीत आहे. धरणगाव तालुक्यात काहीतरी नाविन्यपूर्ण घडावे या प्रयत्नात प्रशासन असताना व कोरोना सारख्या महामारीत लोकं आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत असताना ही तथ्यहीन आरोप करणारी तथाकथित राजकीय व्यक्ती, अवैध वाळू माफिया अशी व्यक्ती कोरोनाच्या काळात रुग्णांच्या मदतीसाठी कधीच पुढे आली नाहीत. आणि अश्या कठीण प्रसंगी यांना असे उद्योग सुचत आहेत, ही केवढी असंवेदनशीलता म्हणावी. तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक व समाजसेवी संघटनांचे नेते, कार्यकर्ते यांना मी काय कार्य करीत आहे, यांना जाणीव आहे.
संजय गांधी योजना शाखेचे लिपिक प्रमोद गायधनी यांच्याबाबतही खोटा आरोप लावला आहे, वरील कार्यालयीन व्यक्तीला लिपिक पदाचे एकही काम व्यवस्थित करीत नाही, पत्र टायपिंग, संगणकबाबत ज्ञान, लाभार्थ्यांचे बिल काढणे, कार्यविवरण, नोंदवही यासंदर्भात ज्ञान नसणाऱ्या आणि कार्यालयात येऊन निव्वळ पेपर वाचन करून दिवसभर काम न करता वेळ मारून नेणे. अश्या लिपीकाला कोणता अधिकारी पाठीशी घालणार..? अश्या बेकायदेशीर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे जर माझ्यावर तथ्यहीन आरोप होत असतील तर हे सर्व बघणारी जनता यांना कधीच माफ करणार नाही. असो, मी व माझ्या कार्यालयातील सर्वच कर्मचारी तालुक्यासाठी रात्रंदिवस कार्यासाठी तत्पर आहोत. वरील सर्व आरोप निराधार आहेत, असेही तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सांगितले.