निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या ‘रेस टू झिरो’ या आंतरराष्ट्रीय मोहिमेत औरंगाबाद महानगरपालिकेचा सहभाग
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या रेस टू झिरो या आंतरराष्ट्रीय मोहिमेत औरंगाबाद महानगरपालिकेने सहभाग घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या करारावर स्वाक्षरी केली असून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. मोहीम नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या अंगाने प्रत्येक क्षेत्रांत नियोजन करून टप्प्याटप्प्याने ही मोहीम यशस्वी पणे राबविण्यात येणार आहे .
डिसेंबर २०१५मध्ये झालेल्या पॅरिस कराराचा भाग म्हणून जवळपास २०० देशांनी हरितगृह वायू उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्याचे वचन दिले आहे. जेणेकरून वैश्विक तापमानात होणारी वाढ ही २ डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित राहू शकेल आणि तापमानवाढ १.५ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी राहील. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी जगातील बर्याच शहरांनी त्यांचे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन नेट-शून्यपर्यंत कमी करण्याचे वचन दिले आहे.
महाराष्ट्राचे पर्यावरण तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पृथ्वी दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद शहर रेस टू झिरो मोहिमेमध्ये सहभागी होतील असे जाहीर केले. या मोहिमेत महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची मोठी भूमिका राहणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विशेष हवामान बदल व जागतिक तापमान वाढ विभाग असून स्मार्ट सिटी च्या या विभागाच्यावतीने मोहिमेचे नियोजन केले जात आहे.