Amalner: नापिकी आणि कर्जबाजारीपणा मुळे शेतकऱ्याची आत्महत्या..!
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील ६५ वर्षीय वृध्द शेतकऱ्याने सतत नापिकी आणि कर्ज याला कंटाळून राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आली आहे. मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विष्णू चौधरी वय 65 हे कळमसरे येथे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. पत्नी, मुलगा, सुन यांच्यासह शेतीचे काम करतात. मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी नित्य नियमानुसार मंदीरावर जावून सर्वांची विष्णू चौधरी यांनी भेट घेतली. कामानिमित्त मुलगा आणि पत्नी बाहेरगावी गेले होते. त्यांनी त्यांच्या पिठाच्या गिरणीच्या स्टोअर रूममध्ये जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी जेवणासाठी घरी आले नसल्याने त्यांची शोधाशोध केली असता त्यांनी पिठाच्या गिरणीच्या स्टोअर रूममध्ये गळफास घेतल्याने निदर्शनास आले.
शेतातील सततची नापीकी आणि डोक्यावर तीन लाखांचे कर्ज या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. त्यांना तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण त्यांना डॉक्टरानी मृत घोषित केले.
यावेळी गावात शोककळा पसरली होती.याप्रकरणी देवीदास चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार सुनील तेली करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मोठा भाऊ नथ्थू चौधरी, मुलगा विकास, सुन नातवंडे व तीन मुली असा परीवार आहे.