Amalner: सार्वजनिक विद्यापिठ कायद्यातील बदल गुणवत्तापूर्ण शिक्षणाला हानिकारक… अभाविप
राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत आज अभाविप तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
दिनांक २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनात या निर्णयाचे रूपांतर कायद्यात करण्याचा मानस राज्य शासनाने पूर्ण
केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असणारे मा.राज्यपाल है देखील कुलगुरुंची थेट नियुक्ती करू शकणार नाही. यापुढे कुलगुरू निवड राज्यशासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच
मा.राज्यपाल यांना करावी लागेल. राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये कुलपती पदावर -प्र- कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात आलेले असून त्या पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती
करण्यात येणार आहे. यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे.
यावरून स्पष्टपणे राजकीय पक्ष नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप निर्णय प्रक्रियेत वाढेल. सन्मा. कुलपती ( राज्यपाल ) हे सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहेत , त्यांच्या अधिकारांवर हे सर्वार्थाने आक्रमण आहे. या निर्णयाने सर्व गुणवत्ताधारक
प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यावर विपरीत परिणाम राजकीय दबावाने होऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक निर्णयामध्ये राज्य शासनाकडे बघावे लागेल. विद्यापीठांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळण्याची शक्यता या निर्णयाने निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल.
तरी विद्यार्थी हिताचा विचार करून हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी अभाविप आपणास करत आहे.असे निवेदन अभाविप ने तहसीलदार यांना दिले आहे.