? रणधुमाळी ग्रामपंचायतीची. चुकीच्या मतदार यादीमुळे संपूर्ण गाव मतदानाला मुकणार, नांदेड जिल्हातील प्रकार
नांदेड : भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. मात्र ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांच्या घोळामुळे, नांदेड जिल्ह्यातील कोसमेट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाळकी खुर्द गावातील मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागणार आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
कोसमेट हे दोन हजार ते अडीच हजार वस्तीचं असलेलं गाव. किनवट तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या यादीमध्ये हे गाव येतं. कोसमेट गट ग्रामपंचायत असलेल्या या ग्रामपंचायत अंतर्गत वाळकी खुर्द या गावातील लोक गेल्या 50 वर्षांपासून मतदानाचा हक्क बजावत होते.
मात्र या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच मतदार याद्यांचा घोळ झाल्याने, वाळकी या गावातील लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला आहे. मतदार याद्यांमध्ये नाव समाविष्ट करुन मतदानाचा अधिकार मिळवा यासाठी वाळकी खुर्द येथील मतदार प्रशासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.
मतदार याद्यांमध्ये अनोळखी लोकांचा मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच गोंधळ उडाला आहे.
गेल्या पन्नास वर्षापासून कोसमेट गट ग्रामपंचायत अंतर्गत वाळकी खुर्द येथील मतदार मतदानाचा हक्क बजावत असताना, मतदार यादीच्या घोळामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे. या याद्यांमध्ये दुरुस्ती करुन मतदानाचा हक्क देण्यात यावा अशी मागणी गावकरी करत आहेत.