?️ निसर्ग चक्रीवादळ अपडेट..पहा चक्रीवादळाचा मार्ग…
मुंबई
अरबी समुद्रात रौद्र रूप धारण करत निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी 1 वाजता अलिबागजवळ धडकलं. वादळी वारे, मुसळधार पाऊस यामुळे कोकणात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. आणखी तीन तास वादळाचा जोर कायम राहील असं भारतीय हवामान खात्याने म्हटलंय.
सध्या कोकणात सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. तर मुंबईत अनेत ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत.
पाहू या अपडेट..
निसर्ग चक्रीवादळाचा जोर पुढच्या तीन तासात कमी होण्याची शक्यता आहे. त्यापुढच्या सहा तासात हे चक्रीवादळाचा प्रभाव ओसरेल. तूर्तास या वादळाचा केंद्रबिंदू पुणे परिसरात आहे असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.
निसर्ग चक्रीवादळानंतर बीकेसीतील दुसऱ्या कोव्हिड-१९ सेंटरच्या कामाला सुरूवात झाली आहे. कोव्हिड-१९ सेंटरला डॅमेज झालं नाहीये.” खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांना शिफ्ट करण्यात आलं होतं असं MMRDAचे आयुक्त आर.ए.राजीव यांनी सांगितलं.
निसर्ग चक्रीवादळ रायगडमधून कर्जतकडे सरकले आहे. आतापर्यंत सर्वाधिक फटका मुरुड आणि श्रीवर्धनाला बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तातडीने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. ‘या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत, परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी तारा तुटल्या, विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. प्रशासन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे’.
‘मुंबईला असलेला चक्रीवादळाचा धोका कमी झालेला असला तरी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. हे चक्रीवादळ केंद्रबिंदू पासून सरासरी दोनशे किलोमीटर पर्यंत परिणाम करते. निसर्ग चक्रीवादळाची दिशा बघता पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे’, असं त्यांनी पुढे सांगितलं.
निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला पार केलं आहे. वादळ धडकल्यानंतर ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने मुंबई आणि ठाणे परिसरात वारा वाहत असल्याचं आपण अनुभवत आहोत. या भागांमध्ये पाऊसही पडत आहे असं भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितलं.
चक्रीवादळामुळे अनेक मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. NDRFचे जवान घटनास्थळी काम करताना
सांताक्रुझमध्ये एका इमारतीचं काम सुरू होतं. जोरदार वाऱ्यामुळे सिमेंटच्या विट्या पडल्यामुळे बाजूच्या झोपडीत राहणारे तीनजण जखमी झाले आहेत.
अग्निशम दल, होमगार्ड तसंच सर्व यंत्रणा तयार आहेत. लोकांना चक्रीवादळाचा फटका बसू नये यासाठी समुद्रकिनाऱ्यानजीकच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धनच्या दिवे आगर परिसरात धडकलं तेव्हा…
चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्याच्या काही भागात मोबाईल नेटवर्क ठप्प झालं आहे अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
चक्रीवादळ मुंबई, ठाण्यातुन उत्तर महाराष्ट्राकडे जाताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तातडीने बचाव कार्य करावे व सावधानता बाळगावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहेत. निसर्ग चक्रीवादळ मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागातून उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने कूच करत आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संध्याकाळी सातपर्यंत विमानांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानता यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीवर्धनला चक्रीवादळाचा तडाखा बसला. सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी घरांची छप्परं उडून गेली.
राज्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 21 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांनी एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केलं आहे अशी माहिती NDRFचे व्यवस्थापकीय संचालक एस.एन. प्रधान यांनी दिली
निसर्ग चक्रीवादळ दुपारी 1 वाजता अलिबागजवळ धडकलं. पुढच्या तीन तासात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असं भारतीय हवामान खात्याने म्हटलंय.
रायगड जिल्हयातीलच दिवे आगार-श्रीवर्धनला हे चक्रीवादळ आदळलं, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
वादळी परिस्थिती बघता मुंबईच्या वांद्रे-वरळी सीलिंकवर वाहतूक थांबवण्यात आली आहे.तर मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल आणि अग्निशमन दलाचे प्रमुख यांनी दादर आणि गिरगाव चौपाटीची पहाणी केली.
उत्तर महाराष्ट्रातही या वादळाचे पडसाद पाहायला मिळत आहेत. “आज दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, त्यामुळे शक्यतो घराबाहेर पढू नये,” असं आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केलं आहे.
12 वाजता – निसर्ग चक्रीवादळाचे मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असे परिणाम जाणवू लागल
रायगड पोलिसांनी समुद्र किनारपट्टीजवळ वास्तव्यास असलेल्या सुमारे 1,400 नागरिकांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलंय. यादरम्यान कुणीही घराबाहेर पडू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
रायगडमध्ये काल रात्रीपासून आज दिवसभरासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तर, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबा. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे
सध्या मुंबईसह किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.
हवामान खात्याने सकाळी साडेपाचला दिलेल्या अपडेटनुसार, या चक्रीवादळाचं केंद्र किंवा डोळा हा ईशान्येकडे सरकतोय, आणि दुपारून अलिबागजवळ धडकणार (लँडफॉल). याला लँडफॉल म्हणतात.
मंगळवारी संध्याकाळी हे वादळ ताशी 13 किलोमीटर वेगाने पुढे सरकलंय आणि ते पुढील 12 तासांत (म्हणजे आज सकाळपर्यंत) अधिक तीव्र होऊन ‘सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म’चं रूप धारण करू शकतं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.