धसई बाजारपेढेमध्ये आदिवासी लुट सुरूच – तहसिलदार यांच्याकडे बाजारभाव तपासण्याची बिकेडी मुरबाड मागणी
प्रतिनीधी – दिलीप आंबवणे
ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यामधील धसई या बाजारपेठेतील व्यापारी,आसपासच्या आदिवासी बहुल सर्वसामान्य ग्राहकांची करोना टाळेबंद काळात चढ्या भावाने वस्तू,किराणा सामाची विक्री करून,जनसामान्यांची लूट करीत असल्या बाबत तक्रार तहसिलदार यांच्याकडे बिरसा क्रांती दल शाखा मुरबाडच्या वतीने केली आहे.
धसई ही बाजारपेठ आदिवासी बहुल लोकवस्ती असलेली बाजारपेठ आहे. सदर बाजारपेठेवर धसईसह आसपासचे सुमारे ८०ते९० आदिवासी वाड्या,खेडे,पाडे अवलंबून आहेत.जगासह देशात करोना महामारीचे संकट उभे असताना आणि कोणताही व्यापारी बाजारभावापेक्षा चढ्या भावाने आपल्या कडील वस्तूंची विक्री करणार नाही असे शासन प्रशासनाचे स्पष्ट आदेश असताना,सदर बाजारपेठेत जाणुन बुजून सर्वसामान्य आदिवासी जनतेच्या मजबुरीचा फायदा उठवून बिनदिक्कतपणे सदर बाजारपेठेतील व्यापारी चढ्या भावाने वस्तूंची विक्री करताना निदर्शनास येत आहेत.
बाजार भावाविषयी दुकांदारासोबत बोलले असता ते म्हणतात माळ मिळत नाही;म्हणून बाजारभाव जास्त आहे.तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर नका घेऊ!अशी अरेरावी भाषाही काही व्यापाऱ्यांची झाली आहे.त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.टाळेबंद काळात माझ्या आदिवासी बांधवाना रोजगार नसल्यामुळे व सदर बाजारपेठेतील नफेखोरीसाठी बाजारभाव वाढवून सदर बाजारपेठेतील धनदांडगे व्यापारी माझ्या आदिवासी सर्वसामान्य जनतेच्या मयताच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचे काम करत आहेत.हातावर पोटभरणारा माझा आदिवासी समाज त्यात टाळेबंद असल्यामुळे हाताला काम नसल्यामुळे,आर्थिक परिस्थितीचे फाटलेले आभाळ कसे शिवायचे हा यक्ष प्रश्न पडला आहे.त्यामुळे जनसामान्य हवालदिल झाले आहेत.मुसळधार पाऊस,वादळवारा या नैसर्गिक आपत्तीने तर माझ्या आदिवासींच्या घरावरील छप्पर उडवून नेल्यामुळे काही बेघर झाले आहेत,काही पीडितांना तर अद्याप जिल्हा नैसर्गिक आपत्ती कक्षाकडून कोणत्याही प्रकारची मदतही मिळाली नाही;अशी परिस्तिथी असताना त्यात बांधकाम साहित्याचीही व्यापाऱ्यांनी चढ्या भावाने विक्री करण्यास सुरुवात केली असल्यामुळे,सर्वसामान्यांचा जीव अगदी मेटाकुटीला आला आहे.बाजारपेठेतील व्यापारी वर्ग काही वस्तूंची बाजारमुल्य दुपटीने आकारीत असल्याचे निदर्शनास येत आहे.कोणत्याही वस्तूचे पक्के किंवा कच्चे देयक देत नाहीत.कोणत्याही दुकानासमोर भावफळक लावलेला दिसून येत नाही.ज्या ग्राहकांच्या जोरावर आपण धनदांडगे झाले आहोत आज आणीबाणीच्या परिस्थितीत त्या ग्राहकांना सहकार्य करण्याऐवजी त्यांची दिशाभूल करून त्यांना लुटण्याचा जणू कट रचला जात आहे.
ज्या प्रमाणे शासनाने दरफलक जाहीर केला आहे.त्याप्रमाणे वस्तूंचा दर व्यापाऱ्यांनी लावणे अपेक्षित आहे.याबाबत नियमांचे पालन व्यापारी वर्ग नियमांचे उल्लंघन करतानाच दिसतो.अशांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा प्रशासनाचा आदेश असताना,सदर प्रशासकीय आदेशाला व्यपाऱ्यांकडून फाट्यावर मारले जात आहे.अशा व्यापाऱ्यांच्या कृत्या बाबत प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सदर बाजारपेठेमध्ये तोतया गिऱ्हाईक बनून जाऊन,सदर बाबीचा पर्दाफाश करून कारवाई करणे अपेक्षित आहे.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थां प्रशासनाकडून शासकीय दरपत्रकाचे होर्डिंग जनजागृतीस्तव बाजारपेठेत दर्शनीय ठिकाणी लावून,त्या बाजारभावानेच ग्राहकांनी घरेदी करावी असे आव्हान करावे.
तरी या बाबीचा शासन प्रशासनाने गंभीरतेने विचार करून माझ्या गरीब दुबळ्या सर्वसामान्य आदिवासी जनतेची पिळवणूक थांबवावी.
बिरसा क्रांती दलाच्या ठाणे जिल्हा कार्यध्यक्षा सौ.संध्याताई जंगले, अध्यक्ष तुकाराम रडे, सचिव तथा सरपंच मधुकर पादीर, उपाध्यक्ष दिलीप शिद, महासचिव दिनेश नंदकर, कार्यध्यक्ष रविंद्र आंबवणे, युवा अध्यक्ष संजय घुटे, संपर्क प्रमुख तुकाराम वाघ, कोषाध्यक्ष काकाजी वाघ, खजिनदार छगन वाघ या नागरिकांनी मागणी केली आहे.